Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा शहरात स्वच्छतेचे तीनतेरा ; रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे तर नाल्या तुंबल्या.

 लोहा शहरात स्वच्छतेचे तीनतेरा ; रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे तर नाल्या तुंबल्या.

---------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि

अंबादास पवार 

---------------------------

 नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष


   "स्वच्छ शहर.. सुंदर शहर" ही संकल्पना केवळ कागदावरच दिसून येत असून आजघडीला लोहा शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर कचऱ्याचा खच तर नाल्या कचरा व घाण पाण्याने तूंबल्या असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे आणि नालीच्या घाण पाण्याने शहर वाशियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचा ठेका लातूर येथील ठेकेदारास मिळाला असला तरी तो कागदोपत्री स्वच्छता दाखवून आणि टेबलवर चिरीमिरी ठेवून बिल काढून घेण्यात येत असल्यामुळे स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.

            लोहा शहर हे प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण असून लोहा शहराचा संपूर्ण कारभार हा नगर परिषदेकडे आहे. जानेवारी महिन्यात पालिका कारभाऱ्याचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता पालिकेवर प्रशासक राज आहे. लोहा पालिकेला कायम मुख्याधिकारी नसल्यामुळे पालिकेचा कारभार हा तहसिलदार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर मागील आठ महिन्यांपूर्वी लोहा पालिका हद्दीतील स्वच्छतेचा ठेका हा लातूर येथील ठेकेदारास सुटला आहे. एकूण ३५ कर्मचाऱ्यामार्फत शहरातील स्वच्छता करणे बंधनकारक असताना ठेकेदार हा २० ते २५ कर्मचाऱ्यांवर ठेका चालवतो. जवळपास दोन-दोन महिने स्वच्छता कामगारांचे वेतन वेळेवर देत नसल्यामुळे मजूर स्वच्छता कामावर येत नाहीत. तर सध्या केवळ पाच कामगारांवर तीस ते पस्तीस हजार लोकवस्तीच्या शहराची स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. ठेकेदारास पालिकेचे ट्रॅक्टर, घंटागाडी, इंधन मिळते कामावर केवळ मजूर लावून शहरात साफ सफाई करून घेणे एवढेच काम असताना ठेकेदारास तेवढेही जमत नसेल तर त्याचा ठेका रद्द करावा असे शहर वाशियतून बोलले जात आहे. कागदोपत्री स्वच्छतेचा ठेका घेतलेला ठेकेदार पालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना चिरीमिरी देवून बिले काढून घेत असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, नाल्या तुंबून घाण पाणी रस्त्यावर येत आहे. रस्त्याने चालताना नाकाला रुमाल बांधून चालावे लागत आहे. तर घाणीमुळे शहर वाशियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे ठेकेदार हा उंची पोहचवला असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments