Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भाषेवर प्रभुत्व असल्यास नोकरीच्या अनेक संधी - श्रीमती स्वाती महांकळ.

 भाषेवर प्रभुत्व असल्यास नोकरीच्या अनेक संधी - श्रीमती स्वाती महांकळ.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

--------------------------------

वाई  आपण जी भाषा वापरतो तिच्यावर प्रभुत्व असेल तरच विविध क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक योग्य भाषा वापरली पाहिजे. अशी प्रतिपादन ज्येष्ठ निवेदिका व पत्रकार स्वाती महांकळ यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता दर्जा कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत होते. याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, मराठी विभाग प्रमुख डॉ चंद्रकांत कांबळे, डॉ धनंजय निंबाळकर अंतर्गत गुणवत्ता दर्जा कक्षाचे सहसमन्वयक डॉ. बाळकृष्ण माघाडे व दर्शन धामणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी मराठी भाषेचे महत्त्व सांगताना महाकाळ पुढे म्हणाल्या, मराठीचा प्रचार व प्रसार सर्वत्र झाला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात प्रसार माध्यमांचे महत्त्व वाढीस लागले आहे. उत्तम निवेदन, रेडिओ जॉकी, वृत्तांत लेखन, जाहिरात लेखन, मुद्रित शोधन इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या ठिकाणी असलेल्या अंगभूत कौशल्यांचा विकास करून मराठी भाषेवर प्रभुत्व संपादन केले पाहिजे. तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यास सर्वांना ते शक्य आहे. मराठी विषयाची पदवी संपादन करून आपण बीएड किंवा नेट/सेट होऊन शिक्षक होऊ शकतो. आपल्याकडे हुकमी प्रतिभा असे तर आपण उत्तम लेखक होऊ शकतो. दोन भाषा उत्तम येत असतील तर भाषांतर क्षेत्रामध्ये काम करून आपण अर्थाजन करू शकतो. मुक्त विद्यापीठांचे छोटे-छोटे अनेक पोस्टल कोर्सेस करून भाषिक कौशल्य आत्मसात करू शकतो. मुलाखत लेखन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असून आजच्या काळात त्याची गरज आहे. आपण ज्या परिसरात राहतो त्याची सूक्ष्म माहिती आपल्याकडे असेल तर आपण लेखन करताना त्याचा उपयोग होतो. महाविद्यालय आपल्यासाठी अनेक कौशल्य आधारित कोर्सेस देणार आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. डॉ. सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे. अनुवादाच्या क्षेत्रात कुशल व्यक्तींची गरज आहे, अनेक भारतीय भाषांचे ज्ञान असेल तर दोन संस्कृतीमध्ये आदान प्रदान होऊन भाषा विकसित होते. अनेक प्रकारच्या प्रसारमाध्यमांमुळे भाषा आत्मसात करणे सोपे झाले आहे. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये दुभाषकाची गरज असते परंतु त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाची सुरुवात श्री. अनिल लाखे यांनी गायलेल्या कुसुमाग्रजांच्या गरजा जयजयकार…. या गीताने झाल. मराठी विभागाचा माजी विद्यार्थी श्री. अमोल मांढरे यांच्या वैचारिक मंथन या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे संदेश दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा का साजरा केला जातो त्याचे महत्त्व सांगितले. डॉ. संग्राम थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, डॉ. बाळकृष्ण मागाडे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन डॉ. अमोल कवडे व सुमती कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटोखालील ओळी – कार्यक्रमावेळी बोलताना श्रीमती स्वाती महांकळ शेजारी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनिल सावंत, दर्शन धामणकर आदीं मान्यवर

Post a Comment

0 Comments