शेतमजूरांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळाले पाहिजे तसेच त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.कॉम्रेड रघुनाथ देशिंगे.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
प्रमोद पंडीत
---------------------------------
" कामगार व सरकारी कर्मचारी यांना जर नियमाप्रमाणे वेतन,पेन्शन व इतर सोई सवलती मिळतात तर मग शेतीचा कणा असलेला शेतमजूर यांनाही किमान वेतन, आरोग्य व शैक्षणिक सुविधा,सकस व मुबलक रेशन आणि पेन्शन मिळालीच पाहिजे कारण यांच्या जीवावर शेती व शेतकऱ्यांचे आणि सरकारचे अर्थकारण चालते " असे मत कॉम्रेड रघुनाथ देशिंगे यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने धावडशी ता.सातारा येथे शेतमजूरांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील लेखक संघाचे राज्य सहसचिव कॉम्रेड प्रा. आनंद साठे होते.कॉम्रेड देशिंग पुढे म्हणाले, " प्रत्येक शेतमजूरास किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार रुपये वेतन,त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मोफत सोयी,आरोग्य सुविधा,मुबलक व सकस रेशनींग व साठ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना पेन्शन दिलीच पाहिजे.त्यासाठी आपण सर्वांनी संघटीत होऊन, आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या पाहिजेत.तरच तुम्हा सर्वांना न्याय मिळेल.
त्यानंतर कॉम्रेड प्रा.आनंद साठे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले " इथली अर्थव्यवस्था श्रमिक, कष्टकरी,शेतकरी - शेतमजूर व कामगारांच्या श्रमावर उभा राहिली आहे.त्यामुळे या सर्वांचा सर्वांगीन विकास करण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची आहे.
लोकांच्या करातून सरकार पोसले जाते.हा जनतेचा पैसा सर्वांना समान वाटला गेला पाहिजे किंवा त्यांच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे.त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे,आंदोलने व सत्यग्रहाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ यात.त्यानंतर आपण आपली संघटीत ताकद अशीच चिरंतन ठेवूयात " असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कॉम्रेड धनराज कांबळे यांनी प्रास्ताविक केले.ही सभा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कॉम्रेड वैभव कांबळे व कॉम्रेड सौ.रेखा सपकाळ यांनी खूपच परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी धावडशी व परिसरातील शेतमजूर स्त्री - पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी कॉम्रेड सुरेश सपकाळ यांनी आभार मानले.
0 Comments