Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन सेना कलावंत कार्यकर्ता मेळावा.

 रिपब्लिकन सेना कलावंत कार्यकर्ता मेळावा.

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

  नवी मुंबई (उल्हासनगर ):-डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या बहुआयामी चळवळीचा एक अतिशय महत्त्वाचा आयाम म्हणजे सांस्कृतिक विभाग.या विभागातील जलशांनी जी क्रांती केली त्यातूनच पुढे दलित साहित्याचा उगम झाला. साहित्य आणि कला यांच्यामुळे क्रांतीची पार्श्वभूमी तयार होत असते. क्रांतिकारकांच्या मनाची मशागत होत असते. 'जलसा' या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ गाण्याबजावण्याची बैठक, गाण्याची मैफिल, सभा, सम्मेलन, अधिवेशन, उत्सव असा असला तरी आंबेडकरी चळवळीत या शब्दाला ऐतिहासिक व क्रांतिकारी संदर्भ आहेत.

सत्यशोधकी विचारधारा, सत्यशोधक समाजाची तत्वप्रणाली, म. फुले, कृष्णराव भालेकर, राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य आणि कर्तृत्व यांना अनुसरणारा आशय असलेल्या सत्यशोधकी जलशांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्माण झालेले आंबेडकरी जलसे आणि त्यात काम करणारे कलावंतकार्यकर्ते यांचा खऱ्या अर्थाने वारसा चालवायचा असेल तर आजच्या कवी-गायक-वादक यांनी गांभीर्याने चिंतन आणि मनन करणे गरजेचे आहे. हाच धागा पकडून संयोजक विक्रमभाई खरे यांनी या कलावंतकार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केल्याचे दिसते. सत्यशोधकी जलसाकारांसमोर ब्राह्मणी वर्चस्व, जातीभेद, धर्मभोळेपणा, अंधश्रद्धा हे विषय 'आ' वासून उभे होते. त्यांवर सडेतोड टिका करणारी पदे, अखंड, लावण्या, पोवाडे, संवाद, फार्स, वग हे सत्यशोधकी जलसाकार सादर करून समाजाचे प्रबोधन करीत होते. तर दलित प्रबोधन, दलित संघटन, दलित जागृती, दलित शिक्षण, दलित संघर्ष आणि अंतिमतः दलित कल्याण हा आंबेडकरी जलसाकरांचा मुख्य हेतू होता. आज 'हिंदू-हिंदुत्व-हिंदुराष्ट्रवाद' विरुद्ध 'भारतीय-भारतीयत्व-भारतीयराष्ट्रवाद' हा खरा आणि महत्त्वाचा संघर्ष असून भारतीय संविधान पर्यायाने भारतीय लोकशाही धोक्यात आलेली असून आपल्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे. बेरोजगारी, महागाई तर आहेच शिवाय सरकारी नोकरी, उच्च शिक्षण मिळण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. सामाजिक आरक्षणावर टाच आणली जात आहे. आता यावर एकच एक उपाय उरला आहे तोम्हणजे सत्तापरिवर्तन. सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'रिपब्लिकन चळवळ' ही मोठ्या नेटाने चालवत आहेत. त्यांना बळ देण्याचे काम हे कलावंतकार्यकर्ते लोकप्रबोधनाच्याद्वारे करू शकतात. ही 'लोकप्रबोधनाची दिशा' कोणती असावी? त्यात सुसूत्रता व एकवाक्यता आणता येईल का? या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंतांना संघटित करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. या माध्यमातून आंबेडकरी गीतकारांच्या, गायकांच्या कार्यशाळा घेऊन ही प्रबोधनाची दिशा निश्चित करता येऊ शकते. अन्यायाची चीड व परिवर्तनाची चाड असणाऱ्या कलावंतकार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे अर्थात प्रत्येक कलावंत हा कार्यकर्ता व प्रत्येक कार्यकर्ता हा कलावंत आहे असे आमचे मत आहे; म्हणून प्रत्यक्ष एखादी कला आपण सादर करू शकत नसाल किंवा रिपब्लिकन सेनेचे एखादे पद देखील आपल्याकडे नसेल तरी सुद्धा आपण या मेळाव्यास उपस्थित राहावे व जमेल त्या पद्धतीने लोकशिक्षण करण्याच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन या मेळाव्याचा अध्यक्ष व मार्गदर्शक श्रीपती ढोले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments